आरसा नसता तर…
कधी कधी मनात येते की, खरेच, नसताच आरसा, तर काय झाले असते? छे, छे! कल्पनाच करवत नाही. माझे तर स्पष्ट मत आहे की, आरसा नसता, तर माणूसच निर्माण झाला नसता. माणूस मुळात प्राणीच.
प्राण्याचे जीवन जगता जगता त्याच्यात मनुष्यत्वाचे गुण निर्माण झाले आणि तो माणूस
बनला.
हा जो बदल घडला, तो आरशामुळेच. आरसा हा माणसाच्या माणूसपणाचा अविभाज्य
घटक आहे. आरशाचे उपयोग काय? हा प्रश्न जर
अगदी पहिलीतील मुलाला विचारला, तरी तो पटकन
सांगेल, “स्वत:ला पाहण्यासाठी!” स्वत:ला पाहणे, स्वत:चे रूप न्याहाळणे, ही तर माणसाची
मूळ प्रवृत्तीच आहे.
आपले दर्शन प्रसन्न व्हावे, यासाठी माणूस
धडपड करतो. घराबाहेर पडताना माणसे आरशात पाहतात, नीटनेटके होतात, हे तर आहेच; पण घरी पाहुणे
आले, तर आरशात पाहिल्याशिवाय कोणतीही स्त्री दार उघडायला
पुढे होत नाही.
इतकेच काय, दार उघडायला उशीर झाला, तरी आरशात डोकावण्यासाठी काही क्षण खर्च करणारे पुरुषही मी पाहिले आहेत. आपण
प्रसन्न दिसावे, इतरांच्या मनात आपल्याला महत्त्व प्राप्त व्हावे, ही प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा असते.
किंबहुना, आपल्याला महत्त्व मिळावे, आपले मोठेपण, वेगळेपण प्रस्थापित व्हावे, ही माणसाच्या प्रत्येक कृतीमागे प्रबळ अशी प्रेरणा असते, असा सिद्धांत डॉ. सिग्मंड फ्रॉईड या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने मांडला
आहेच. मला तर खात्रीच आहे की, प्रत्येक
पराक्रमानंतर पराक्रमी व्यक्तीने आरशात डोकावलेले असणारच!आरसा नसता, तर माणसाच्या मनातला हा पराक्रमाचा उत्सव त्याला
साजरा करता आलाच नसता. मी तर पुढे जाऊन असे म्हणेन की, आरसा नसता, तर पराक्रम गाजवण्याची प्रेरणाच निर्माण झाली नसती!मला आठवते, गावी जत्रेत आरसेमहालाचा एक तंबू असायचा. त्या तंबूत
नेहमीच गर्दी उसळलेली असायची. त्या आरसेमहालात विविध प्रकारचे आरसे असायचे. त्या
विविध आरशांत आपल्याच विविध प्रतिमा दिसायच्या.
गोल गरगरीत, भरपूर जाड, काठीसारखी उंच
किंवा बुटकी अशी स्वत:ची ती वेडीवाकडी, चित्रविचित्र
रूपे पाहून प्रत्येक जण मनसोक्त हसायचा स्वत:चीच थट्टा करणे, स्वत:चीच गंमत पाहणे! भावनांचे केवढे सुंदर विरेचन आहे हे! आरसा नसता, तर माणूस स्वत:कडे इतक्या निर्मळपणाने पाहूच शकला नसता.
आरशाने अवघे मानवी जीवन व्यापून टाकले आहे. घरात, दारात, बॅगांवर, कपड्यांवर, दुकानांत, रस्त्यांवर, गाड्यांमध्ये, जत्रांमध्ये… सर्वत्र… इथे तिथे सर्वत्र आरसा आहे. किंबहुना, आरसा नसलेले घर या जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही.सौंदर्याचे विविध आकार, विविध रूपे
लेवून आरसा सर्वत्र मिरवत असतो. सौंदर्यनिर्मिती ही माणसाच्या मूलभूत
प्रवृत्तींपैकी एक आहे. आरशाने माणसाच्या या प्रवृत्तीला केवढा वाव दिला आहे! सत्य, शिव आणि सौंदर्य यांचा शोध घेणे ही माणसाची पुरातन काळापासूनची खोलवरची इच्छा
आहे.
आरसा नसता, तर सौंदर्यनिर्मितीच्या महामार्गावरील माणसाची वाटचाल
कायम अयशस्वी राहिली असती! अगदी प्राचीन काळी, माणूस हा माणूस बनला, प्राणिअवस्थेतून
बाहेर पडला, तेव्हा त्याला पाण्यात स्वत:चे प्रतिबिंब दिसले
असणार.
‘मी कोण?’ हा प्रश्न
त्याला त्या वेळी स्वत:ला न्याहाळताना पडलेला असणार. तिथपासून ते आजपर्यंत माणूस
आरशात न्याहाळतोय. स्वत:चा शोध घेतोय. माणूस आरशात पाहतो, तेव्हा तो स्वत:तील सुंदरतेला शोधतो.
ही सुंदरता म्हणजे आत्माच होय. आत्म्याचा शोध घेता घेता माणूस परमात्म्याचा
शोध घेतो. संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, “दर्पणी पाहता
रूप। न दिसे हो आपुले॥” आरशात आपल्याला परमात्म्याचेच रूप दिसते. मोक्षाच्या
मार्गावरचे हे पहिले पाऊल होय! आरसा नसता, तर माणसाला
इतक्या उदात्त मार्गावर कोणी नेले असते?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा